स्वामी विवेकानंद

Posted on Wednesday, January 12, 2011 by maaybhumi desk

'ज्ञान हा जीविताचा आदि हेतू आहे. दुसरा हेतू सुखप्राप्ती आहे. या दोहोंच्या सांगडीनें हा विश्वसमुद्र तरून पैलतीरास तुम्ही जातां आणि तीच मुक्ती ! पण ही मुक्ती एकट्यालाच मिळवितां येत नाहीं. जगातील कीडमुंगीसारखे प्राणी मुक्त होतील तेव्हाच तुम्हांस खरा मुक्तिलाभ होईल. सर्व सुखी होईपर्यंत आपण एकटे सुखी आहोंत असे म्हणण्याचा अधिकार कोणासही नाही. तुम्ही कोणाला दु:ख देत असतां तेव्हा स्वत:च्या दु:खाचा पाया तुम्ही खणीत असतां हें लक्षात ठेवा.
कारण, तुम्ही आणि तुमचे बांधव वस्तुत: परस्परांपासून भिन्न नव्हेत. जो स्वत:ला सार्‍या विश्वात आणि विश्वाला स्वत:त पाहतो तोच खरा योगी.' हा विश्वप्रेमाचा संदेश स्वामी विवेकानंद यांनी दिलेला आहे.

click hereविवेकानंदांची जयंती काही ठिकाणी बंगाली कालगणनेप्रमाणे साजरी केली जाते. तर बर्‍याच ठिकाणी ती इसवीसनाच्या गणनेप्रमाणे १२ जानेवारी या तारखेला मानली जाते. विवेकानंदांनी वरील अवतरणात आपल्या धर्मसंस्कृतीतील भक्तिप्रेमाचे तत्त्वज्ञान सरळ शब्दांत मांडलेले आहे. हा विवेकानंदांचा विचार म्हणजे ज्ञानेश्वरमाऊलींच्या पसायदानाचेच एक स्वरूप आहे, असे म्हटले पाहिजे. सर्व प्राणिमात्रांचे कल्याण इच्छिणार्‍या ज्ञानेश्वरांनी सर्वांप्रती असलेली समदृष्टी या अवतरणातूनही प्रकट झालेली आपणाला आढळून येईल. जो जे वांछिल, तो ते लाहो प्राणीजात असे ज्ञानोबांनी म्हटले आहे आणि जगातील सर्व प्राणिमात्र, अगदी कीडमुंगीसुद्धा जेव्हा मुक्त होतील तेव्हाच मानवजातीलाही मुक्ती लाभेल, असे विवेकानंद मानतात.


हा विचार माणसाच्या मनात जर पुरतेपणी रुजला तर सर्व जग सुखी होण्यास मुळीच विलंब लागणार नाही. पण इथे एक मेख आहे. विशेषत: सध्याच्या काळात तर ही मेख जरूर समजून घेतली पाहिजे. तुम्ही ज्या माणसांशी भलेपणाने वागता, सौजन्याचा व्यवहार ठेवता ते जर तुमच्याशी कपटीपणाने वागले, तुमच्या सौजन्याचा त्यांनी गैरफायदा घेऊ पाहिला तर कसे होईल ? सौजन्य म्हणजे दुर्बलता नव्हे. तुकोबांनी दयेची व्याख्या करतांनासुद्धा दया तिचे नाव, भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे, असे म्हटले आहे. म्हणजे सर्व प्राणिमात्रांचे पालन करणे ही आपली जबाबदारी आहे, हे आम्ही मान्य करतो, पण त्याबरोबरच या प्राणिमात्रांपैकी जे दुष्टदुर्जन असतील त्यांना योग्य अद्दल घडविल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ''भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे काठी हाणू माथां'' असा इशारा तुकोबा रोखठोक शब्दांत देतात. ज्ञानोबा माऊली ''खळांची व्यंकटी सांडो'' या शब्दांत दुष्टांनी आपल्या वागण्यातील वाकडी प्रवृत्ती सोडून द्यावी, ती दुष्टता सांडली जावी, आपोआप नाहीशी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करतात. तर विवेकानंदांनी वरील अवतरणात प्रत्येक मानवप्राणी आणि हे विश्व यामधील एक अतूट धागा आपल्याला उलगडून दाखविला आहे आणि त्या धाग्याचा संदर्भ देऊन आपण सगळे एकच आहोत, सगळेच बांधव आहोत आणि हे विश्व म्हणजे एक प्रकारे तुमचेच रूप आहे, हा मुद्दा अधिक प्रभावीपणे मांडला आहे.

दुसरा सुखी असल्याशिवाय तुम्ही सुखी होऊ शकत नाही, असे विवेकानंदांचे म्हणणे आहे आणि हे म्हणणे आधी सांगितल्याप्रमाणे सर्वांनीच मान्य केले पाहिजे. अन्यथा साध्या, सरळ माणसाच्या भलेपणाचा फायदा घेण्यासाठी मतलबी, कावेबाज ठिकठिकाणी टपून बसलेले आहेतच.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "स्वामी विवेकानंद"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner