सावता माळी

Posted on Wednesday, June 23, 2010 by maaybhumi desk


5262_Mahas माळियाचे वंशी, सांवता जन्मला | पावन तो केला | वंश त्याचा ||
त्याजसवें हरी, खुरपूं लागे अंगी | धांवूनि त्याच्यामागें | काम करी ||
पीतांबर कास, खोवोनी माघारी| सर्व काम करी | निज अंगे ||
एका जनार्दनीं, सांवता तो धन्य| तयाचें महिमान | न कळें कांही ||
सांवता माळी हे ज्ञानदेव, नामदेव यांचे समकालीन.
पंढरपूरजवळ अरणभेंडी या गावी ते राहात असत. सावता माळी ह्यांचा

'कांदा मुळा भाजी | अवघी विठाबाई माझी|
लसूण मिरची कोथिंबिरी | अवघा झाला माझा हरी ||
ऊस गाजर रताळू | अवघा झालासे गोपाळू||
मोट नाडा विहीर दोरी | अवघी व्यापिली पंढरी ||
सांवता म्हणे केला मळा | विठ्ठल पार्यी गोविला गळा ||
हा अभंग प्रसिद्ध आहे. आपण जे काही करतो ती विठ्ठलाचीच पूजा आहे, असा सावता माळी यांचा दृढ विश्वास होतो. इतकेच नव्हे, तर इतर धर्मांचेही संत आपल्याकडे झाले आहेत. परधर्मात जन्माला आले असले तरी त्यांनी पांडुरंगाची प्राप्ती तर करुन घेतलीच, पण संतमंडळीत गौरवाचे आणि सन्मानाचे स्थानही मिळविले. एकदा ज्ञानदेव, नामदेव आणि पांडुरंग असे कूर्मदास नावाच्या एका संताच्या भेटीला चालले होते. वाटेत सांवता माळी यांचे गाव अरणभेंडी लागले. तेव्हा पांडुरंगाने 'तुम्ही येथेच थांबा, मी सांवत्यास भेटून येतो' असे सांगितले. पांडुरंगाला गंमत करण्याची लहर आली. तो धावत धावत सांवता माळ्याकडे गेला आणि म्हणाला, 'माझ्या मागे दोन चोर लागले आहेत, मला कुठेतरी लपव. सांवत्याने बलरूप घेतलेल्या पांडुरंगाला आपल्या पोटावर बांधले आणि वरुन उपरणे किंवा कांबळे बांधले.

ज्ञानदेव आणि नामदेव पांडुरंगाची वाट पाहून थकले आणि पांडूरंगाला शोधत सांवता माळ्याच्या मळ्यापर्यंत आले. त्यांनी पांडुरंग कुठे आहे, याची चौकशी केली. ज्ञानदेव आणि नामदेव दोघेही ज्ञानी होते. त्यांना सांवत्याच्या पोटापाशी पांडुरंग आहे हे समजले आणि मग सांवता माळी यांना बरोबर घेऊनच हे तिघेही कूर्मदासाला भेटायला गेले. ह्या कथेत एक असा अतिरंजित भाग आहे की, सांवता माळी यांनी आपले पोट चिरुन आत पांडुरंगाला ठेवले. ही कथा सत्याअसत्याच्या कसोटीवर तपासून पाहणे शक्य नसले तरी पोट चिरुन आत पांडुरंगाला ठेवण्याइतपत ताणण्याची काही गरज आहे, असे वाटत नाही.

सावता माळी आणि पांडुरंग यांचे अगदी जवळचे संबंध होते, एवढे जाणता आले तरी पुष्कळ झाले. सावता माळी हे आपल्या दैनंदिन कामकाजात विठ्ठलाचेच रुप पाहात असत. त्यांच्या सासुरवाडीचे लोक एकदा त्यांच्याकडे आले. सावता माळी भजनात रंगून गेले होते. त्यांनी सासूरवाडीच्या लोकांकडे लक्ष दिले नाही. पत्नी संतापली, त्यावेळी त्यांनी आपल्या पत्नीला जो उपदेश केला तो पुढीलप्रमाणे -

प्रपंचीं असूनि परमार्थ साधावा | वाचे आठवावा पांडुरंग ||
उंच नीच कांही न पाहे सर्वथा | पुराणींच्या कथा पुराणींच ||
घटका आणि पळ साधीं उतावीळ | वाडगा तो काळ जाऊं नेदी ||
सावता म्हणे कांते जपें नामावळी | हृदयकमळीं पांडुरंग ||
आपल्या कामात परमेश्वर पाहणारे, काम हाच परमेश्वर अशी दृढ श्रद्धा बाळगणारे आणि स्वत:च्या पत्नीसही अधिकारवाणीने परमार्थाचा उपदेश करणारे सावता माळी त्यांच्या काळात महाराष्ट्राच्या भक्तीच्या मळ्याची मनोभावे जपणूक करीत होते, हे आपले भाग्यच नाही काय?

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "सावता माळी"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner