'दहशतवादी हल्ले थांबवण्याची जबाबदारी पाकवरच'
नवी दिल्ली
भारतावर हल्ला होऊ शकणार नाही याची खात्री देऊ शकत नाही या पाकिस्तानच्या पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांच्या वक्तव्याचा भारताने कडक शब्दात समाचार घेतला असून भारतावर अशा प्रकारचे होणारे हल्ले रोखण्याची जबाबदारी पूर्णपणे पाकचीच असल्याचे सांगत पाकने आपल्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ न देण्याच्या आपल्या शब्दावर आणि दहशतवादाविरोधात कारवाईच्या आपल्या जबाबदारीवर ठाम राहण्याची गरज असल्याची शिकवण दिली आहे.
या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे, की आपल्या देशातील दहशतवादी नेटवर्क आणि तळ उध्वस्त करणे ही एका जबाबदार राष्ट्राचे कर्तव्य आहे. त्या दृष्टीने पाकने भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या आपल्या देशातील दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करणे गरजेचे आहे.
पाकचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी शुक्रवारी एका वक्तव्यात भारतावर पुन्हा मुंबई सारखा हल्ला होणार नाही याची खात्री आपण देऊ शकत नसल्याचे सांगून आपला देश रोजच अशा हल्ल्यांचा सामना करीत असल्याचे रडगाणे गायले होते.
No Response to "'दहशतवादी हल्ले थांबवण्याची जबाबदारी पाकवरच'"
Post a Comment