शिवराज्याभिषेक सोहळयास केंद्राची मंजुरी
मुंबई
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला पंतप्रधान कार्यालयातून परवानगी देण्यात आली असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. त्यामुळे शिवराज्याभिषेकावरून सुरू झालेला वाद संपुष्टात आला असून, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच येत्या सहा जून रोजी हा सोहळा पार पडणार आहे.
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास, केंद्र सरकारच्या अखत्यारितील पुरातत्व खात्याने मनाई केली होती. त्याविरोधात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी बिगुल वाजवल्याने संघर्षाची चिन्हे दिसत होती. कोणत्याही परिस्थितीत हा सोहळा साजरा करणारच, असा निर्धार व्यक्त करतानाच सहा जूनला आपण स्वतः सोहळ्यासाठी रायगडावर उपस्थित राहणार असल्याचेही ठाकरे यांनी जाहीर केले होते. शिवसेनेच्या इशार्याची दखल घेत, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वतः याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. अखेर आज शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने परवानगी दिली आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्याबाबतची घोषणा केली. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने श्रेय लाटण्याची संधी शिवसेनेला मिळू नये, यासाठीच मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार दरबारी त्यांचे वजन वापरले. त्यांची विनंती केंद्र सरकारने मान्य केल्याने शिवप्रेमींचा रोष टाळण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.